विरहाचं दुःख काय असतं ते त्या नभाला विचारा,
कारण स्वतःची सावली त्या सागरावर पडून देखील तो सागराला भेटू शकत नाही…
आणि सरतेशेवटी त्या देवाला सुद्धा त्यावर दया येत असावी,
म्हणूनच तो एक कल्पनात्मक रेष निर्माण करतो.
आपण त्याला ‘क्षितिज’ या नावाने ओळखतो…
विरह म्हणजे विरस आणि दुरावा यांच मिलन,
की फक्तचं प्रेमाने रुसून फुगून बसलेली माणसं
हे दुःख मात्र प्रत्येक हृदयाला कधी ना कधी वेडं करतं एवढं मात्र खरं.
आणि मग पश्चात्ताप असतो तो, की ती माणसं आपल्या आयुष्यात आलीच का…
जर दुरावा नियतीत होता,
तर का बरं ही जवळीक मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात अजून जिवंत होती…
तेव्हा मात्र नशिबाचं गणित चुकल्याचा भास होतो,
आणि मन मात्र अजूनही हट्ट करत असतं, की हा विरह कधी संपेल का…
मनाला फार हुरहुर होती कारण वेळ कमी होता.
कदाचित विरहाच्या भीतीमुळे कायमचा दुरावा येणार नाही ना,
शेवटी त्या मनाने आस सोडली…
कारण नात्यांना गमावणे लहानपणीच अनुभवलेले आपण सगळेच…
पण हो, कोणावाचून कोणाचं अडत नाही हे जितकं खरं असलं तरी
भावना मनातून पुसून काढणं निव्वळ अशक्य…
असा आहे हा विरह जिथे दुःख आणि खेद तर आहेच.
पण त्या सोबत एक ओली जाणीव आहे मनाच्या कोपऱ्यात जी जगणं शिकवते…

snappygoat.com