२१ व्या शतकाच्या प्रारंभी, पृथ्वी सूर्याला म्हणाली
तुझ्या माझ्या दरम्यान, एक सनातन नाते आहे !

त्या नात्याला सृजनाचा, सुंदर आविष्कार आहे
म्हणूनच तुझ्या कक्षे भोवती फिरता -फिरता …
मी स्वतः चे गोलाकार विश्व तयार केले
त्यातच मी भान हरपून रममाण झाले.
मी स्वतःभोवती फिरत असताना, एक रमणीय विश्व तयार केले !
सुंदर पर्वतरांगा – डोंगर दऱ्या, समुद्र नद्या, पशु पक्षी, हवा -पाणी, अग्नी आणिक इतर बरेच काही..
सर्वात महत्वाचा माझा लाडका पुत्र ‘मानव’
मातेच्या वात्सल्याने त्याच्या गरजा भागविण्यात रममाण होत राहिले मी …
शतकं गेली, युगे लोटली हे सारं करत, गोलाकार फिरता -फिरता ,
माझी काया हि थकली !
माझ्या लाडक्या सुपुत्राची कर्तबगारी,
उंच -उंच इमारती, कारखाने, चांद्रमोहीम, अवकाश मोहीम, हे उभारण्यातच दमले !
पण भास्करा …
मातेलाच ओरबाडून, घणाचे घाव घालून, भौतिक सुखाची लयलूट करणाऱ्या या नादान महत्वाकांक्षी
पुत्राला मी उबगले आहे! म्हणून प्रार्थना करते …
हे आदित्या,
तुझ्या माझ्यातील सनातन नात्याला निरोप देऊया,
सृजनाचा मोहक अविष्कार कदाचित थांबेल हि !
मग ….तुझ्या आणि माझ्या नात्याला नवीन धुमारे फुटतील काय ??